Wednesday, May 5, 2010

धन्याची एंगेजमेंट

खुप दिवसांपासून धन्याच्या एन्गेजमेंटची तयारी सुरु होती. तयारी म्हणजे कोण कधी येणार, कोण कोणाला कधी आणि कसे पिक-अप करणार वैगेरे. ह्या सगळ्या गोंधळात मी फक्त सोलापूरला जाण्याचे तिकीट काढले आणि रीटर्नचे तिकीट काढणे मी सोयिस्करपणे विसरलो. अरे हो. मी मधेच सुरुवात केली का? तर आपण पहिल्यापासून सुरुवात करुयात.

तर हा धन्या (की धण्या? माहिती नाही. कारण कोणत्याही पुस्तकात मी हे असे नाव कधी वाचले नाही). संपूर्ण नाव : धनंजय अरूण कुंभार. बाकी सगळी माहिती ओघाणे येइलच. तर ह्याची एंगेजमेंट २५ ऑगष्ट २००९ ला सोलापूर जवळील मोहोळ ह्या ठिकाणी ठरली. आणि आम्ही सगळ्या मित्रांनी सोलापूरला जाण्याचा प्लॅन केला. ह्या प्लॅन अंतर्गत मी सोलापूरला बस स्टॅन्ड वर सकाळी ५ ला पोहोचायचे, धन्याला कॉल करायचा, नंतर अन्त्याने रेल्वे स्टेशन वर ५:३० ला पोहोचल्यावर आम्हा दोघांपैकी एकाला कॉल करायचा, धन्या मग मला बाइकवर पिक अप करून आम्ही अन्त्याला पिक अप करायचे आणि धन्याच्या घरी जायचे. बाकी मित्र कसे येणार आहेत हे त्यांना आणि धन्याला माहिती होते. मी एवढे सगळे डिटेल मधे का सांगतोय? कारण इथेच ह्या ब्लॉगचा जन्म झाला. मी सोलापूरात उतरल्यानंतर धन्याला आणि अन्त्याला कॉल करून पाऊस पाहत उभा होतो आणि असाच धन्याबद्दल विचार करत होतो. तर गेल्या ८ वर्षांच्या सगळ्या आठवणी एकामागे एक धडाधड येवून उभ्या राहील्या. तेव्हाच ठरवले, माझ्या मराठी ब्लॉगची पहिली पोस्ट हीच. खूप दिवस चाललेली माझी मराठी ब्लॉगपोस्टच्या विषयाची शोधमोहिम संपली!

तर हा धन्या सोलापूरातून आलेला, ईंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षात राहुल्या (राहुल मोहीते) आणि अंत्या (अनंत जोशी) ह्यांच्याबरोबर होस्टेलच्या सर्वात गजबजलेल्या रूम १०२ मधे राहाणारा प्राणी (प्राणी? हो, ह्याला प्रत्यक्षात पाहिल्यावर तुम्हाला प्रचिती येइलच). जर ह्या प्राण्याची थोडक्यात ओळख करुन द्यायची झाली तर हा प्राणी एकदम साधा, सरळ, मनमिळाऊ, प्युअर सोलापुरी मराठी झाडणारा, अतिशय भावनिक, अतिशय स्वप्नाळू, सगळ्या खेळात आवड असणारा (खरोखर सगळ्या!!), मुलींपासुन दोन हात लांब राहाणारा पण तरीही प्रत्येक ३ मधल्या २ मुलींबद्दल खुप खुप सिरीयस होणारा, स्वत:ची मनसोक्त लाल करणारा, सदा न कदा मित्रांची खेचण्यात आनंद मानणारा, तर स्वत:ची खेचून घेण्यात परमानंद मानणारा (ह्या गुणाचे मला अजुनही मला ठिकसे आकलन झाले नाही की धन्या असे का वागतो? असो), आणि सगळ्या ईंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसारखा आळशी असा होता. होता म्हणजे अजुनही बराचसा तो तसाच आहे, पण थोडे चांगले बदल (उ.दा. भाषेतील बदल) त्याच्यामधे झाले आहेत.

ह्याच्यासारखेच आम्हीही सगळे घराबाहेर राहाण्यासाठी पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. पहिल्याच वर्षात आमचा मस्त ग्रुप बनला. खुप गप्पा, दंगा, मस्ती, कॉलेज, मेस, खेळणे अशा सगळ्या सगळ्या गोष्टी मित्रांबरोबरच होवू लागल्या. सगळ्या आनंदा-दुखाच्या गोष्टी मित्रांबरोबर शेअर होवू लागल्या. का कोण जाणे पण, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी घरच्यांबरोबर शेअर करण्यापेक्षा मित्रांबरोबर शेअर करणे सोपे बनले. सगळे एकमेकांची खुप काळजी घेत असु, जणु काही आमचे जग मित्रांजवळ सुरु होवुन मित्रांजवळच संपते अशी परिस्थिती होती. घरी गेले तरी २-३ दिवसांनंतर होस्टेलची ओढ लागायची. मला वाटते, सगळे आपल्या वयाचे असल्यामुळे आणि सगळा वेळ एकत्र घालवल्यामुळे होस्टेल लाईफमधे बनलेले मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात खुप महत्वाचे स्थान करून बसतात. बर ह्या होस्टेल लाइफ़बद्दल इथेच थांबतो, नाहीतर मला दूसरी पोस्ट लिहायला काहीच रहायचे नाही! तर आपण फ़क्त धन्या नावाच्या प्राण्याबद्दल थोडेसे बोलुयात.

तर ईंजीनिअरींग लाईफ़मधल्या धन्याबद्दल लिहायचे झाले तर प्रत्येक पेपरनंतर पेपर अवघड गेला म्हणून रडत बसणारा धन्या मला अजून आठवतो. प्रत्येक पेपरनंतर (खरोखर प्रत्येक, अगदी शेवटच्या वर्षीच्या पेपरनंतरसुद्धा) रडायचे आणि त्यातच पुढच्या पेपरच्या तयारीची वाट लावून टाकायची! एवढे सगळे करुन रिझल्ट मात्र वेगळेच काही सांगायचे. असो!

कोणतीही गोष्ट करायची म्हटली की ती पूर्ण मन लावुन करायची आणि त्याचा पूरेपूर आनंद घ्यायचा, मग तो अभ्यास असो, टाईमपास असो, खेळ असो की लाल करणे असो... प्रत्येक गोष्ट धन्या तेवढयाच जोमाने करणार. आणि करताना सगळ्या मित्रांना घेवून करणार. अशा खूप गोष्टी मला आठवतात. कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर धन्या सगळे मॅनेजमेंट करणार, सगळ्यांना बाहेर जायला तयार करणार, कुणामधे वाद असतील तर ते सोडवणार, प्रत्येक इवेंटमधे आपल्या ग्रुपला एन्जॉय कसा करता येईल ते पाहणार... जणू ह्या सगळ्याची अलिखीत जबाबदारी धन्याकडेच असते!

आम्ही शेवटच्या वर्षी कॉलेजमधे स्किट कॉम्पिटीशनमधे एक नाटक केले होते. बाप रे! कसली धमाल केली होती आम्ही. मला पूर्वकटूअनुभवामुळे नाटकात काम करायचा काहिही इंटरेस्ट नव्हता, पण माझा रोल खूप छोटा असून त्यात फक्त मीच शोभेल अशी मला फूस लावून मला ऍक्टींगसाठी तयार केले गेले (धन्याचा त्यात मोठा हात होता हे वेगळे सांगायला नकोच). आम्ही खुप प्रॅक्टीस केली आणि खूप मजाही केली. नाटक झाल्यानंतर आम्ही खुप खुप खुश होतो, मला अजुनही आठवतय, आम्ही खूप दंगा केला होता नाटकानंतर...

शेवटच्या वर्षी तर आम्ही काहीच केले नाही. फक्त आणि फक्त गप्पा चालायच्या. रात्रं रात्र आमच्या गप्पा रंगायच्या. त्या गप्पांना ना विषयाचे बंधन होते ना वेळेचे. आजही आम्ही दोघे तिघे भेटलो की घड्याळाचे काटे बाहेर काढून अन वेळ विसरून गप्पा मारत बसतो. गप्पा कशाबद्दल? कशाहीबद्दल.. अगदी कशाहीबद्दल!

अजुन एक गोष्ट आठवते, कॉलेज संपल्यानंतर आम्ही काही मित्र होस्टेलवर ३/४ दिवस जास्त थांबलो होतो. असाच एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी. तेव्हाही खूप मजा केली होती. आणि शेवटच्या दिवशी एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडलो होतो. किती छान दिवस होते ते! लिहिण्यासाठी खूप खूप आहे. पण मला मराठीमधे लिहिणे अवघड जात आहे. आणि तुम्ही लोक सुद्धा कमेंट मधे अजून आठवणी जोडा..

आता पोस्टच्या विषयाबद्दल थोडेसे. विशेष जास्त असे काही नाही. मी धन्याच्या आई वडीलाना पहिल्यांदाच भेटत होतो पण तसे एकदाही जाणवले नाही. धन्याच्या स्वभावामुळे त्याचे घरचे कसे असतील ह्याची जाणीव तर होतीच आणि काका काकूंनी सुद्धा जणू खूप वेळा भेटलो आहोत असे वागवले. तर त्या दिवाशीदेखील आम्ही खूप मजा केली. आम्ही सगळे मित्र धन्याची मस्त उडवत होतो आणि विशेष म्हणजे काकू अन गीताताई सुद्धा त्यासाठी आमच्यामधे सामिल झाल्या होत्या!

हे सगळे संपल्यानंतर धन्या मला अन अन्त्याला स्टेशनवर सोडवायला जेव्हा आला, तेव्हा वेळ तसाच थांबून रहावा असे वाटत होते. एकमेकांना सोडतानासुद्धा डोळ्यात पाणी का आणि कधी उभे राहिले ते कळलेच नाही...